किल्ले भगवंतगडवर शिवजयंतीचा सोहळा उत्साहात संपन्न; चिंदर सेवा संघाचा पुढाकार
मालवण,दि.२०: छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर सखोलपणे समजून घ्यायचा असेल, तर तो समकालीन लेखकांच्या नजरेतून अभ्यासणे गरजेचे आहे. कवी भूषण हे महाराजांच्या राजदरबारातील समकालीन कवी होते, त्यामुळे त्यांच्या काव्यातून महाराजांचा खरा आणि जाज्वल्य इतिहास समोर येतो. महाराजांच्या जीवनातील विविध पैलू समजून घेण्यासाठी कवी भूषण यांचेच काव्य अत्यंत उपयोगी पडते, असे प्रतिपादन ‘मराठी शिवभूषण’ पुस्तकाचे लेखक व इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर यांनी केले. ऐतिहासिक किल्ले भगवंतगड येथे चिंदर सेवा संघ व शिवप्रेमींच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने किल्ला परिसर दणाणला
या सोहळ्याची सुरुवात श्री देव सिद्धेश्वर आणि शिवप्रतिमेच्या पूजनाने झाली. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी, चिंदर सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री आणि रत्नाकर कोळंबकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी संपूर्ण किल्ला परिसर दणाणून गेला होता. कार्यक्रमात चिंदर गावातील विविध वाड्यांमधील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट सादरीकरणे केली. यामध्ये शिवजन्मोत्सव, महिला वर्गाचा पाळणा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने अवतरला शिवकाळ
श्री देवी भगवती उत्साही मंडळ चिंदर भटवाडी व भटवाडी शाळेच्या वतीने सादर केलेला शिवराज्याभिषेक सोहळा आणि दिंडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. आशिष कोरगांवकर आणि सहकाऱ्यांनी सादर केलेला पोवाडा, तसेच वरद जोशी व विद्यार्थ्यांनी सादर केलेले मर्दानी खेळ यांनी शिवकालीन वातावरणाची निर्मिती करत कार्यक्रमात मोठी रंगत आणली. लावण्या दत्तदास, आराध्या घागरे, गौरव दत्तदास, किंजल परब, वैखरी केळकर आणि रिया कोकरे यांनी वैयक्तिक सादरीकरणे करत आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले. कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवत आपल्या जीवनातील अनुभव कथन केले.
मान्यवरांचा गौरव आणि लोकसहभाग
याप्रसंगी इतिहास संशोधक रणजित हिर्लेकर आणि ज्येष्ठ साहित्यिक सुरेश ठाकूर गुरुजी यांचा चिंदर सेवा संघाच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी केंद्रप्रमुख प्रसाद चिंदरकर, पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, राजेंद्र पाताडे, देवेंद्र हडकर, लक्ष्मण पाताडे, संदीप परब, रवींद्र गोसावी आदी मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. ‘तुर्या द ग्रुप ऑफ आर्ट्स’ व कला शिक्षक गणेश अपराज यांच्या वतीने सहभागी शाळांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्याला सरपंच सौ. स्वरा पालकर, सचिव सिद्धेश गोलतकर, खजिनदार गणेश गोगटे यांच्यासह चिंदर गावातील ग्रामस्थ, महिला आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार प्रास्ताविक कु. मिताली आचरेकर हिने केले, तर सूत्रसंचालन आणि आभार सिद्धेश गोलतकर यांनी मानले.

