सावंतवाडी,दि.१८: तालुक्यातील असनिये येथे काजू उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित एक विशेष मार्गदर्शन शिबीर १७ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडले. प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले आणि कृषी विभाग, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. काजू बागायतदारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांचे उत्पन्न वाढवणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.
या शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले येथील सहयोगी संशोधन संचालक डॉ. वैभव शिंदे उपस्थित होते. त्यांनी काजूच्या सुधारित लागवड पद्धती, लागवड तंत्रज्ञान आणि बागेचे योग्य व्यवस्थापन कसे करावे, यावर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. कनिष्ठ काजू पैदासकार डॉ. मैथिलीश सपनस यांनी काजूच्या भरघोस उत्पादन देणाऱ्या विविध सुधारित जातींची माहिती देऊन शेतकऱ्यांनी योग्य जातींची निवड करण्याचे महत्त्व पटवून दिले.
काजू पिकावरील कीड आणि रोगांचे संकट ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या असते. या विषयावर संशोधन सहयोगी श्री. के. व्ही. स्वामी यांनी प्रभावी व्यवस्थापन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन केले. बांदा येथील मंडळ कृषी अधिकारी श्री. युवराज भुईम्बर यांनी ‘बायोचार’ या विषयावर सखोल माहिती देत ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ कसा घ्यावा, याबद्दल शेतकऱ्यांना अवगत केले. तांबोळी येथील सहाय्यक कृषी अधिकारी श्री. मिलिंद सुरेश निकम यांनी आधुनिक काळाची गरज ओळखत ‘महाविस्तार AI’ या तंत्रज्ञानाचा वापर कृषी क्षेत्रात कसा करावा, याची प्रात्यक्षिके दाखवली आणि विभागाच्या इतर योजनांची माहिती दिली.
असनिये येथील पूर्व-प्राथमिक शाळेत सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत हे शिबीर रंगले. या कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक डॉ. डी. जे. वाघ, कर्मचारी सौ. परब, श्री. जंगले व श्री. परब यांची प्रमुख उपस्थिती होती. गावातील प्रगतशील शेतकरी आणि महिला बचत गटांच्या सदस्यांनी या शिबिराला मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत आणि आभार प्रदर्शन श्री. मिलिंद सुरेश निकम यांनी केले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गावातील प्रगतशील शेतकरी श्री. आनंद पांडुरंग सावंत, श्री. शरद भिवसेन सावंत आणि श्री. भरत सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. भोजन व्यवस्थेची जबाबदारी श्री. अभिमन्यू सावंत यांनी सांभाळली, तर शाळेचे मुख्याध्यापक श्री. गवस सर यांनी सभागृहाची सोय उपलब्ध करून देऊन सहकार्य केले. दुपारच्या भोजनानंतर या ज्ञानवर्धक शिबिराची सांगता झाली.

