सावंतवाडी, दि.०५ : तालुक्यातील तळवडे येथे सुरू असलेल्या तिरंगी निवडणूक लढतीत अपक्ष उमेदवार गंगाराम उर्फ अमेय पै यांनी आपल्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. “मी येथील स्थानिक उमेदवार असून, जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे मला मिळेल. जनतेच्या सेवेची संधी मला नक्की मिळणार,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
अमेय पै यांनी यापूर्वी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारीची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्यासह तब्बल १३ इच्छुक उमेदवारांना भाजपने तिकीट नाकारले, आणि बाहेरून उमेदवार आणून उभा केल्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व जनतेमध्ये तीव्र नाराजी असल्याचा आरोप त्यांनी केला.
“स्थानिक कार्यकर्त्यांकडे आणि जनतेकडे दुर्लक्ष करून बाहेरचा उमेदवार लादण्यात आला आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे,” असे अमेय पै म्हणाले. ही नाराजी महायुतीच्या उमेदवाराला मोठा फटका देणार असून, त्याचा थेट फायदा आपल्यालाच होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तळवडे परिसरात अमेय पै यांना मोठ्या प्रमाणात स्थानिक पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत असून, त्यांच्या प्रचाराला वेग आला आहे. जनतेशी थेट संपर्क, स्थानिक प्रश्नांची जाण आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे मतदारांचा कल आपल्याकडे झुकत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आता या तिरंगी लढतीत जनतेचा कौल कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
मी जिंकणारच अपक्ष उमेदवार अमय “पै” यांचा दावा

