सावंतवाडी,दि.२९: माजगाव पंचायत समिती मतदारसंघातील निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले असून, अपक्ष उमेदवार जितेंद्र गावकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सोनुर्ली येथील ग्रामदैवत श्रीदेवी माऊलीच्या चरणी श्रीफळ ठेवून त्यांनी प्रचाराचा अधिकृत श्रीगणेशा केला. यावेळी त्यांनी सोनुर्ली आणि वेत्ये गावातील मतदारांना भावनिक आवाहन करत, दोन्ही गावांवर झालेल्या अन्यायाचे उत्तर ‘रिक्षा’ या चिन्हासमोरील बटन दाबून देण्याचे आवाहन केले.
जितेंद्र गावकर यांनी भारतीय जनता पार्टीकडे पंचायत समितीच्या उमेदवारीसाठी मागणी केली होती, मात्र पक्षाने त्यांना डावलल्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. वेत्ये आणि सोनुर्ली या दोन्ही गावांमधून त्यांना मोठा पाठिंबा मिळत असून, माजगावातूनही त्यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. आपला जाहीरनामा आणि ‘रिक्षा’ ही निशाणी घेऊन ते आता घरोघरी पोहोचत आहेत. कार्यकर्ते आणि ग्रामस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
प्रचाराच्या शुभारंभावेळी मतदारांशी संवाद साधताना गावकर म्हणाले की, “मी पक्षाकडे सोनुर्ली आणि वेत्ये या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवारी मागितली होती, परंतु नेहमीप्रमाणे आमच्यावर अन्याय करण्यात आला. आता हा अन्याय सहन न करता सर्वांनी एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. माझा वेत्ये गाव माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेच, आता सोनुर्लीतील जनतेनेही मला साथ देऊन विजयाचा मार्ग सुकर करावा. दोन्ही गावे आणि माजगावचे सहकार्य लाभल्यास मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणे शक्य होईल. ‘आज नाही तर कधीच नाही’ ही जिद्द मनात ठेवून प्रत्येकाने पेटून उठावे आणि ही रिक्षा घराघरात पोहोचवून मला प्रचंड बहुमताने विजयी करावे.” या प्रचार मोहिमेवेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते, ज्यामुळे या निवडणुकीत आता मोठी चुरस निर्माण झाली आहे.

