सावंतवाडी,दि.३१: उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर उद्या मुंबईत भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी भेट घेऊन महायुतीची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे. निलेश राणे, उदय सामंत यांच्यासह आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेणार असून, याच ठिकाणी महायुतीबाबतची अंतिम बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आम. केसरकर म्हणाले की, महायुतीतून सर्व निवडणुका लढविण्याचा निर्णय झाला होता. मात्र, उशीर झाल्यास निवडणूक लढवणे अवघड होईल. भाजप आपला निर्णय घेईल, पण आम्ही मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष, तसेच चंद्रशेखर बावनकुळे आदींसह उद्या बैठक घेऊन महायुतीबाबत निर्णय घेणार आहोत. या बैठकीत तिन्ही निवडणूकांबाबत चर्चा होणार आहे.
“सामोपचाराची भूमिका माझी नेहमी असते, त्यामुळे माझा तसा प्रयत्न राहील,” असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
यासोबतच, महायुतीत झाली नाही तर इतर पक्षांतून शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या लोकांचे प्रवेश अडवून ठेवणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजपने प्रवेश घेतल्यानंतर त्याला सुरुवात झाली, मात्र अनेक लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख संजू परब, अशोक दळवी, दिपलक्ष्मी पडते, दादा साईल, खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, प्रेमानंद देसाई, क्लेटस फर्नांडिस आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

